आपली नवी कोरी इंग्लिश कादंबरी प्रकाशित होण्याआधी ‘वेस्टलँड’सारख्या प्रकाशकाकडून १० लाख रुपये अॅडव्हान्स मानधन मिळवणारा तरुण कादंबरीकार अमिश त्रिपाठी आणि लोकमान्य टिळकांकडून ‘भारताचार्य’ उपाधी मिळवणारे विनायक वैद्य यांचा १८ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये दोघांचा अल्प परिचय..............
अमिश त्रिपाठी
१८ ऑक्टोबर १९७४ रोजी मुंबईत जन्मलेला अमिश त्रिपाठी हा भारताचा तरुण कादंबरीकार, ज्याच्या पुराणकथांच्या कादंबऱ्यांनी विक्रीचे नवनवे उच्चांक रचले आहेत.
पहिली कादंबरी प्रकाशित होण्यासाठी २० प्रकाशकांकडून नकार पचवावा लागलेल्या, कोलकात्याच्या ‘आयआयएम’मधून एमबीए केलेल्या या तरुण कादंबरीकाराला आज मात्र त्याची नवी कोरी कादंबरी प्रकाशित होण्याआधी ‘वेस्टलँड’सारख्या प्रकाशकाकडून १० लाख रुपये अॅडव्हान्स मानधन मिळतंय.
त्याच्या पहिल्या तीन कादंबऱ्या भगवान शंकराची कहाणी सांगणाऱ्या होत्या, तर चौथी कादंबरी श्रीरामाची कहाणी मांडणारी. या चार कादंबऱ्यांची एकत्रित विक्री ४० लाखांवर जाऊन उलाढाल तब्बल १०० कोटी झाली आहे. त्यांच्या इंग्लिश कादंबऱ्यांचे भारतातल्या दहा, तसंच इतर पाच भाषांत अनुवाद झाले आहेत.
इंमॉर्टल्स ऑफ मेलूहा, दी सिक्रेट ऑफ दी नागाज, दी ओथ ऑफ दी वायुपुत्राज, सायन ऑफ ईक्ष्वाकु, वॉरिअर ऑफ मिथिला, ऑर्फन ऑफ आर्यावर्त आणि इम्मॉर्टल इंडिया अशी त्याची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
........
विनायक चिंतामण वैद्य
१८ ऑक्टोबर १८६१ रोजी जन्मलेले विनायक चिंतामण वैद्य यांना लोकमान्य टिळकांनी ‘भारताचार्य’ ही उपाधी दिली होती. त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास होता.
दुर्दैवी रंगू, मध्ययुगीन भारत, अबलोन्नती लेखमाला, निबंध आणि भाषणे, मराठी भाषेचा इतिहास, मराठी गद्यरचना, माझा प्रवास असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
१९०८ सालच्या सहाव्या महाराष्ट्र ग्रंथकार संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २० एप्रिल १९३८ रोजी त्यांचं निधन झालं.